लेख सामाजिक

गैरसमज 

सकाळचे ९ वाजले असावेत. समीर रिक्षा मिळवण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा होता. समोरून येणाऱ्या साधारणतः सत्तरीच्या घरातल्या आजोबांना अचानक चक्कर आली. ते खाली कोसळणार, तेवढ्यात समीरने पटकन पुढे जाऊन त्यांना सावरले. 

आजोबांना खूप घाम येत होता, छाती धडधडत होती. समीरने रिक्षा थांबवली आणि त्यांना जवळच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. आजोबांची एकंदर परिस्थिती पाहून रिक्षावाल्या काकांनी रिक्षा भाडे सुध्दा घेतले नाही. त्यांनी स्वतःहून समीरला मदत केली, आजोबांना रिसेप्शन मध्ये नेण्यात. समीरने रिसेप्शनिस्टला काय झाले ते थोडक्यात सांगितले आणि मी घाईत असल्याचे सांगून तो निघून गेला.

डॉक्टरांनी आजोबांना तपासले. केस खूप क्रिटिकल होती. आजोबा कोण, कुठले काहीच माहीत नव्हते. डॉक्टरांना आजोबांच्या खिशात एक कागद आणि एक एन्व्हलप मिळाले. कागदावर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून त्यांच्या मुलाचे नांव आणि अमेरिकेतील फोन नंबर होता. 

डॉक्टरांनी राज, म्हणजे आजोबांच्या अमेरिकेतील मुलाला फोन लावला. बराच वेळ त्याने फोन उचललाच नाही. डॉक्टरांनी चौथ्यांदा फोन केला, तेव्हा राजने फोन उचलला. डॅाक्टरांनी राजला त्याच्या वडिलांच्या गंभीर परिस्थितीची माहिती देऊन काय उपचार करावे लागतील, ते सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य पाहता तुम्ही इथे असावे असे मला वाटते. डॉक्टर कसे शक्य आहे? मला यायला जमणार नाही, परंतु तुम्ही बेस्ट ट्रीटमेंट द्या, कितीही खर्च झाला तरी चालेल. जो काही खर्च होईल तो मी तुम्हाला पाठवीन.

हा सरकारी दवाखाना आहे त्यामुळे काहीच खर्च येणार नाही. पण लक्षात घ्या की कदाचित तुमचे वडिल फक्त १-२ दिवसांचेच सोबती असतील. हे सांगितल्यावरही राजने यायला स्पष्ट नकार देत डॅाक्टर, मी जरा घाईत आहे, म्हणत फोन ठेवला. निर्लज्जपणाचा कळस पाहून डॅाक्टर आश्चर्यचकित झाले. वीस वर्षांच्या वैद्यकीय कारकीर्दीत डॅाक्टरांना असा अनुभव कधीच आला नव्हता.

डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. परंतु ते आजोबांना वाचवू शकले नाहीत. पुढच्याच दिवशी आजोबा गेले. डॉक्टरांनी राजला परत एकदा फोन केला. डॉक्टर मी येऊ शकत नाही, तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या, त्यासाठी लागणारा खर्च मी तुम्हाला पाठवीन. 

गरज नाही पैसे पाठवण्याची, तुमचे वडिल माझ्या वडिलांसारखे आहेत. मी करीन खर्च, डॉक्टर म्हणालेत. पुढे काहीही न बोलता समीरने फोन ठेवला. जन्मदात्याच्या अंत्यसंस्काराला यायला मुलाला वेळ नाही, सरळ सरळ यायला नाही म्हणतो, हे खूपच धक्कादायक होते. आजची पिढी पैशामागे धावताना नातेसंबंध विसरते, याचे हे ज्वलंत उदाहरण होते. 

डॉक्टर, मी आत येऊ का असे विचारत एका तरुणाने डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. मी समीर, काल मी एका आजोबांना हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्यांची तब्येत कशी आहे? समीर विचारत होता. काल मला एका इंटरव्यूला जायचे होते, म्हणून मी त्यांना येथे सोडले आणि घाईघाईत गेलो. खुप दिवसांपासून मी नोकरीच्या शोधात होतो. काल इंटरव्ह्यू झाला आणि आज हवी तशी अॅाफर मिळाली. आजेबांच्या आशीर्वादानेच हे सर्व शक्य झालं. आजोबांच्या औषधासाठी म्हणून मी दहा हजार रुपये द्यायला आलोय. मला त्यांना भेटता येईल का? समीरने विचारले. 

डॉक्टरांनी त्याला आजोबांच्या मृत्यूबद्दल सांगताच समीरला रडु कोसळले. आजोबांचा मुलगा अंत्यसंस्कार करायला देखील यायला तयार नव्हता आणि एक अनोळखी मुलगा आजोबांच्या आशीर्वादाची ताकद जाणून दहा हजार रुपये घेऊन त्यांना भेटायला आला होता. त्यांच्या जाण्याचे कळल्यावर ढसाढसा रडत होता. डॉक्टरांनी समीरचे सांत्वन करून त्याचा पत्ता आणि फोन नंबर घेतला.

अचानक डॉक्टरांच्या लक्षात आले की आजोबांच्या खिशात एक एन्व्हलप होते. डॉक्टरांनी ते उघडले. त्यामध्ये एक लॉटरीचे तिकीट होते. लॉटरीचा काल लागलेला निकाल आजच्या पेपर मध्ये जाहीर झाला होता. डॉक्टरांनी मोठ्या कुतूहलाने निकाल बघितला आणि काय आश्चर्य! त्या तिकिटाला एक कोटी रुपयांचे बक्षीस लागले होते. 

डॉक्टरांनी राजला परत एकदा फोन केला आणि एक कोटीच्या बक्षिसाबद्दल सांगितले. बक्षिसाच्या रकमेचे काय करायचे? डॉक्टरांनी विचारले. तुम्ही डेड बॉडी शीतगृहात ठेवा, मी येतो. पैशाच्या मोहाने किमया केली असावी, राजने येण्याचे मान्य केले. हेही नसे थोडके!

सांगितल्याप्रमाणे राज भारतात आला. डॉक्टरांना भेटला, आजोबांना दवाखान्यात कोणी आणले, त्यांना काय ट्रीटमेंट दिली वगैरे सर्व थोडक्यात सांगत डॉक्टरांनी राजला समीरचे डिटेल्सही दिलेत. 

तुम्ही अंत्यसंस्कार करून या, त्यानंतर मी तुम्हाला लॉटरीचे तिकीट देईन, डॉक्टरांनी सांगितले. राज वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी डेड बॉडी घेऊन गेला.

पाच वाजलेत तरीही राज परत आला नाही म्हणून डॉक्टरांनी राजला फोन केला. राज, मी अजून एक तास हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्यानंतर मी घरी जाईन. मी हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्येच राहतो. तुम्ही आल्यावर रिसेप्शनमधुन मला फोन करा, मी तुम्हाला लॉटरीचे तिकीट देईन डॉक्टरांनी सांगितले. 

आता तुम्ही कुठे आहात? किती वेळ लागेल तुम्हाला? डॉक्टरांनी विचारले. डॉक्टर, मी येणार नाही. मी आत्ताच एअरपोर्टवर पोहोचलोय. काय सांगतात? डॅाक्टरांनी आश्चर्याने विचारले. मला माफ करा डॅाक्टर, मी तुम्हाला न भेटताच परत जायला निघालो.

राज, अहो पण त्या लॉटरीच्या तिकिटाचे काय करायचे? तेवढ्यासाठीच तर तुम्ही भारतात आलात ना? डॉक्टर मी तुमच्या रिसेप्शनिस्टकडे एक अॅाथॅारिटी लेटर दिले आहे. त्यामध्ये मी लिहिले आहे की बक्षिसाच्या रकमेतील एक लाख रुपये समीरला द्यावेत आणि उरलेले हॉस्पिटलला डोनेशन द्यावे. 

राज, तुम्हाला पैसे नको होते तर तुम्ही इतक्या दूर का आलात? डॉक्टरांनी आश्चर्याने विचारले. 

डॉक्टर, तुम्ही मला बाबा क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत असा फोन केला. त्यावेळी माझ्या एकुलत्या एक मुलाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते आणि त्याची कंडिशन सुध्दा खुप क्रिटिकल होती. मी आणि माझी पत्नी काही वर्षांपूर्वीच विभक्त झालो त्यामुळे मुलापाशी फक्त मीच होतो. मला तेथून निघता येत नव्हते. माझा नाईलाज होता.

बाबा गेल्याचे तुम्ही सांगितले, त्यावेळी माझ्या मुलाचे ऑपरेशन सुरू होते, रक्ताची आवश्यकता होती, मी माझे रक्त देत होतो आणि म्हणूनच काळजावर दगड ठेवून मी सांगितले की मी येऊ शकत नाही, तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या. 

दोन तासांनी तुम्ही फोन केला, तोपर्यंत ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले होते आणि डॉक्टरांनी सांगितले की आता काळजी करण्यासारखे नाही. मी माझ्या एका मित्राला हॉस्पिटलमध्ये थांबविले आणि भारतात आलो. मित्राला तिथे किती वेळ थांबवणार?म्हणून मी घाई घाईतच अमेरिकेला परत जातोय. 

डॉक्टर, तुम्ही केलेल्या मदतीबद्दल मी तुमचे मनस्वी आभार मानतो, असे “म्हणताना” राजला आणि ते “ऐकताना” डॉक्टरांना अश्रू आवरता आले नाहीत. 

राजच्या वागण्याची डॅाक्टरांना आलेली चीड, क्षणात नाहीशी झाली आणि सत्य परिस्थितीची माहिती नसताना समीर बद्दल करून घेतलेल्या गैरसमजाबद्दल त्यांना स्वतःचीच कीव आली. 

डॉक्टर राजला धीर देत म्हणालेत, तुमचा मुलगा लवकर बरा होवो ही माझी परमेश्वरापाशी प्रार्थना. 

-दिलीप कजगांवकर, पुणे

७७७००२५५९६

Related posts

अमरावती जिल्ह्यात सुदर्शना फाउंडेशनचा स्वतंत्र दिन साजरा: चांदूर रेल्वे येथे वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम

kalaranjan news

समाजाचे वास्तवी चित्र, ऍड. रमेश उमरगे

kalaranjan news

पद्मिनी फाऊंडेशनद्वारे महिला सक्षमीकरणावर केंद्रित एक समुदाय आधारित कार्यक्रम

kalaranjan news